Online agriculture loan application: शेती हा आपल्या देशाचा कणा मानला जातो. शेतीच्या बळकटीसाठी सरकार सातत्याने विविध योजना राबवत असते. शेतकऱ्यांचे जीवन सुलभ व्हावे, त्यांना तंत्रज्ञानाचा लाभ मिळावा आणि कर्जप्रक्रिया पारदर्शक व जलद व्हावी यासाठी केंद्र सरकारने आता एक महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे. ऑगस्ट 2025 पासून कृषी कर्ज प्रक्रिया पूर्णतः ऑनलाईन होणार आहे.
काय आहे ही नवी योजना?
ॲग्रीस्टॅक (AgriStack) या केंद्र सरकारच्या महत्वाकांक्षी योजनेअंतर्गत ही कर्जप्रक्रिया ऑनलाईन होणार आहे. देशभरात प्रायोगिक तत्वावर ही योजना ऑगस्टपासून राबवली जाणार असून, शेतकऱ्यांना आता थेट आपल्या शेतीच्या बांधावरून भ्रमणध्वनीद्वारे (mobile) कृषी कर्जासाठी अर्ज करता येणार आहे.
एक क्लिकवर मिळणार संपूर्ण माहिती
या योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना एक शेतकरी ओळख क्रमांक (Farmers ID) दिला जात आहे. महाराष्ट्र या बाबतीत आघाडीवर असून, आतापर्यंत 1 कोटी 10 लाखांहून अधिक शेतकऱ्यांनी नोंदणी केली आहे, त्यापैकी जवळपास 99 लाखांहून अधिक शेतकऱ्यांना ओळख क्रमांक देण्यात आला आहे.
या ओळख क्रमांकाचा वापर पॅनकार्डसारखा केला जाणार असून, शेतकऱ्यांच्या नावावर असलेली जमीन, पीक लागवड, मातीचा पोत, बँक माहिती, आधार कार्ड – ही सर्व माहिती एकाच ठिकाणी संकलित केली जाणार आहे. त्यामुळे पुन्हा पुन्हा कागदपत्रांची गरज भासणार नाही.
ऑनलाईन कर्ज अर्जाची प्रक्रिया कशी असेल? (Online agriculture loan application process)
• शेतकऱ्यांना आपला ओळख क्रमांक वापरून आपल्या मोबाईलमधून ऑनलाईन अर्ज करायचा आहे.
• संबंधित बँक त्या अर्जाची सर्व माहिती ऑनलाईन खातरजमा करून पाहील.
• कर्जाला मंजुरी दिल्यानंतर रक्कम थेट शेतकऱ्याच्या जोडलेल्या बँक खात्यात वर्ग केली जाईल.
ही संपूर्ण प्रक्रिया पारदर्शक आणि जलद असेल. कर्ज घेण्यासाठी रांगांमध्ये उभे राहण्याची गरज नाही, ना दरवेळी बँकेच्या फेऱ्या माराव्या लागणार!
बँकांची नोंदणी अनिवार्य
या योजनेत सहभाग घेणाऱ्या सर्व बँकांनी – मग त्या राष्ट्रीयकृत बँका, खासगी बँका, जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँका किंवा ग्रामीण बँका असोत – ॲग्रीस्टॅकवर नोंदणी करणं बंधनकारक असेल. कोअर बँकिंग प्रणाली (CBS) असलेल्या बँकांचे डेटा यामध्ये समाविष्ट केला जाणार आहे.
यासाठी सहकार विभाग पुढील आठवड्यात महत्त्वपूर्ण बैठक घेणार असून बँकांच्या सहभागासाठी कार्यवाही वेगात पार पाडली जाणार आहे.
कृषी क्षेत्रासाठी क्रांतिकारी टप्पा
ॲग्रीस्टॅक योजना म्हणजे केवळ एक डिजिटल उपक्रम नाही, तर कृषी क्षेत्रात मूलगामी बदल घडवणारी क्रांती आहे. यामुळे:
• शेतकऱ्यांचा वेळ, पैसा आणि श्रम वाचणार आहेत
• कर्जप्रक्रियेत पारदर्शकता येणार आहे
• फसवणुकीला आळा बसेल
• सरकारी योजनांची अंमलबजावणी अचूक व प्रभावी होणार आहे
Online agriculture loan application
कृषीमंत्री माणिकराव कोकाटे यांनीही यावर प्रतिक्रिया देताना म्हटले की, ‘कर्ज वितरण प्रक्रियेचा डिजिटल प्रवास हा कृषी अर्थव्यवस्थेचा महत्वाचा टप्पा आहे. यामुळे शेतकऱ्यांना दरवेळी कागदपत्रं गोळा करण्याची गरज उरणार नाही.’
ऑगस्टपासून सुरू होणारा हा प्रायोगिक प्रकल्प भविष्यातील डिजिटल शेतीची पायाभरणी ठरणार आहे. आता खरी गरज आहे, तर प्रत्येक शेतकऱ्याने आपली नोंदणी करून ओळख क्रमांक मिळवणं, आणि डिजिटल युगात एक पाऊल पुढे टाकणं!
➡️ आता शेतीसाठी मिळेल लगेच कर्ज; RBI चा नवा नियम, शेतकऱ्यांसाठी दिलासा