पंजाबराव डख हवामान अंदाज: गेल्या काही दिवसांत महाराष्ट्रात मान्सूनपूर्व पावसानं अक्षरशः हाहाकार माजवला आहे. पश्चिम महाराष्ट्र, कोकण आणि मुंबई परिसरात मुसळधार पावसामुळे शेतीसह जनजीवन विस्कळीत झालं आहे. या वेळी मान्सूनचं आगमनही अपेक्षेपेक्षा लवकर झाल्यानं त्याचा परिणाम पावसाच्या तीव्रतेवर दिसून आला. अनेक शेतकऱ्यांचं आर्थिक नुकसान झालं असून शेतीची कामं ठप्प झाली आहेत.
पण याच पार्श्वभूमीवर प्रसिद्ध हवामान अभ्यासक पंजाबराव डख हवामान अंदाज मांडताना म्हणालेत की, 1 ते 7 जून दरम्यान संपूर्ण राज्यात कोरडं हवामान राहणार आहे. हा काळ शेतकऱ्यांसाठी अतिशय महत्त्वाचा असणार आहे.
30 मेपर्यंत पावसाचा जोर टिकणार
27 ते 30 मे या कालावधीत महाराष्ट्रात विविध भागांमध्ये मुसळधार ते अतिमुसळधार पावसाची शक्यता आहे. विशेषतः दक्षिण महाराष्ट्र, उत्तर महाराष्ट्र, कोकण, खानदेश आणि मराठवाडा या भागांमध्ये पावसाचा जोर अधिक जाणवणार आहे.
याचबरोबर, मुंबई, पुणे, इगतपुरी आणि आसपासचे परिसर याठिकाणी 28 मेपर्यंत जोरदार पावसाची शक्यता आहे. त्यामुळे सध्या सुरु असलेल्या पावसाचा शेवटचा टप्पा 30 मेपर्यंत दिसून येतो.
1 ते 7 जून: शेतकऱ्यांसाठी सुवर्णसंधी
पंजाबराव डख हवामान अंदाजानुसार, 1 जूनपासून 7 जूनपर्यंत संपूर्ण महाराष्ट्रात कोरडे हवामान राहणार आहे. या काळात आकाश निरभ्र राहण्याची शक्यता असून शेतकऱ्यांनी शेतीची सर्व कामं या कालावधीत पूर्ण करावीत असा सल्ला त्यांनी दिला आहे.
त्यांनी स्पष्टपणे म्हटले की, “6 जून पर्यंतच शेतकऱ्यांच्या हातात वेळ आहे. त्यानंतर पुन्हा पावसाची सुरुवात होणार असून, हळूहळू पावसाचं प्रमाण वाढत जाणार आहे.”
7 जूननंतर हवामानात बदल
पंजाबराव डख यांच्या अंदाजानुसार, 7 जूनपासून पावसाला हळूहळू सुरुवात होईल. सुरुवातीला हा पाऊस कमी प्रमाणात असेल, पण दिवसेंदिवस त्यामध्ये वाढ होणार आहे. यामुळे खरीप हंगामाच्या तयारीसाठी 1 ते 6 जून हा काळ अत्यंत महत्त्वाचा ठरणार आहे.
शेतकऱ्यांनी काय करावे?
• 1 ते 6 जून या दरम्यान मशागत, बियाणं टाकणं, खताची नियोजन इ. कामं आटोपून घ्यावीत.
• पुढील पावसासाठी तयार राहण्याची काळजी घ्यावी.
• हवामानाचा सातत्याने मागोवा घ्यावा.
पंजाबराव डख हवामान अंदाज शेतकऱ्यांसाठी आशेचा किरण ठरू शकतो. 1 ते 7 जून दरम्यान मिळणारा कोरड्या हवामानाचा कालावधी खरीप हंगामाच्या सुरुवातीसाठी संधी देणारा आहे. त्यानंतर परत पावसाचा जोर वाढणार असल्यामुळे, शेतकऱ्यांनी या कालावधीचा पुरेपूर उपयोग करून शेतीची तयारी पूर्ण करावी.