Maharashtra Rain Alert: राज्यात 25 जुलै रोजी विविध भागांमध्ये मुसळधार ते अतिमुसळधार पावसाची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे. त्यामुळे राज्यातील कोकण, पश्चिम महाराष्ट्र, विदर्भ, मराठवाडा आणि उत्तर महाराष्ट्रातील अनेक जिल्ह्यांना यलो, ऑरेंज आणि रेड अलर्ट देण्यात आला आहे. 25 जुलै रोजी पावसाचा जोर जास्त असणार असल्यामुळे नागरिकांनी सतर्क राहावे आणि प्रशासनाच्या सूचनांचे पालन करावे, असे आवाहन करण्यात आले आहे.
Maharashtra Rain Alert
कोकण विभागातील पालघर, ठाणे, मुंबई, रायगड, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यांमध्ये पावसाचा जोर अधिक असण्याची शक्यता आहे. पालघरला यलो अलर्ट, ठाणे, मुंबई आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट तर रायगड आणि रत्नागिरी जिल्ह्यांना रेड अलर्ट देण्यात आला आहे. या भागांमध्ये मुसळधार ते अति मुसळधार पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे.
पश्चिम महाराष्ट्रातील पुणे, सातारा आणि कोल्हापूर घाटमाथ्यावर अतिमुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे. पुणे आणि सातारा घाटमाथ्यावर रेड अलर्ट, तर कोल्हापूर घाटमाथ्यावर ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला आहे. घाटमाथ्यावरील भागात दरड कोसळण्याचा धोका असल्याने पर्यटकांनी आणि वाहनचालकांनी खबरदारी घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे. पुणे, सांगली, सोलापूर, कोल्हापूर आणि सातारा जिल्ह्यांना यलो अलर्ट देण्यात आला आहे.
मराठवाड्यात छत्रपती संभाजीनगर, बीड, लातूर आणि धाराशिव जिल्ह्यांमध्ये हलक्या स्वरूपाचा पाऊस होण्याची शक्यता आहे. तर जालना, परभणी, हिंगोली आणि नांदेड जिल्ह्यांमध्ये विजांचा कडकडाट, वादळी वाऱ्यांसह काही ठिकाणी जोरदार पाऊस, तर काही ठिकाणी हलका ते मध्यम पाऊस होण्याचा अंदाज आहे. या आठही जिल्ह्यांना यलो अलर्ट देण्यात आला आहे.
उत्तर महाराष्ट्रातील नाशिक, धुळे, नंदुरबार, जळगाव आणि अहिल्यानगर जिल्ह्यांमध्ये हलका ते मध्यम पाऊस होण्याची शक्यता असून विशेषतः नाशिक घाटमाथ्यावर मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे. त्यामुळे नाशिक जिल्ह्याला यलो अलर्ट देण्यात आला आहे.
विदर्भात 25 जुलै रोजी पावसाचा जोर अधिक जाणवणार आहे. अकोला, बुलढाणा, वाशिम आणि यवतमाळ जिल्ह्यांत वादळी वारे आणि विजांच्या कडकडाटासह पावसाची शक्यता असल्याने यलो अलर्ट देण्यात आला आहे. अमरावतीमध्येही मुसळधार पावसाचा अंदाज असून तेथेही यलो अलर्ट आहे. भंडारा, चंद्रपूर, गडचिरोली आणि गोंदिया जिल्ह्यांत अति मुसळधार पावसाचा अंदाज असून या जिल्ह्यांना रेड अलर्ट देण्यात आला आहे. नागपूर आणि वर्धा जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे.
Maharashtra Rain Alert
राज्यात अनेक भागांमध्ये अति मुसळधार पावसाची शक्यता असल्याने वाहतूक, शेती आणि जनजीवनावर परिणाम होण्याची शक्यता आहे. नागरिकांनी अनावश्यक प्रवास टाळावा, डोंगराळ आणि नदीकाठच्या भागात राहणाऱ्यांनी अधिक सतर्क राहावे. आपत्कालीन परिस्थितीत स्थानिक प्रशासनाशी संपर्क साधावा, असे आवाहन करण्यात आले आहे.
➡️ शेतात जाण्यासाठी स्वतंत्र शेतरस्त्याची मागणी कशी करायची? अर्जप्रक्रिया काय आहे? – पहा एका क्लिकवर
